वसई : बुरशी लागलेली मिठाई रिसायकल करून बाजारात विकली जात आसल्याचे पोलिसांना आढळले आहे. याप्रकरणी वसईतल्या एका गोदामावर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामध्ये 250 किलो मिठाई जप्त करण्यात आली आहे. एफडीएने (अन्न व औषध प्रशासन) पुढील कारवाई करणे आवश्यक आहे. परंतु एफडीएला पुढील कारवाई करण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे

वसई-विरार परिसरात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. काही दिवसांपूर्वी वसईत बनावट पनीरच्या कारखान्यांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता वसईत बुरशी लागलेली मिठाई पुन्हा रिसायकल करुन विकली जात असल्याचे आढळले आहे.

नायगांव पूर्वेकडील वाकीपाडा येथील श्री कृष्णा मंगल डेअरी अँड स्वीट मार्टच्या कारखान्यावर छापा मारला असता अत्यंत धक्कादायक घटना उघड झाली आहे. 100 किलोपेक्षा जास्त बुरशी लागलेली मिठाई या कारखान्यात आढळून आली आहे.

या मिठाईत, बर्फीत घातक असं केमिकल हे मिसळले जात होते. केसर बर्फीचा स्वाद आणण्यासाठी साध्या बर्फीत लाल केमिकल वापरले जात होते. बुरशी लागलेली मिठाई एका मशीनद्वारे प्रक्रीया करून पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध केली जात आहे. पोलिसांनी अशी 150 किलो मिठाई यावेळी जप्त केली आहे.

श्री कृष्णा मंगल डेअरी अँड स्वीट मार्टच्या कारखान्यात लाडू, पेढे, मलई बर्फी, अंजीर बर्फी, मिल्क केक, मावा, काजू बर्फी, बनवली जाते. मावा बनविण्यासाठी गुजरात गोल्ड, प्रिमियम गोल्ड पावडर मिसळली जात होती. तसेच या डेअरीत केमिकलच्या बाटल्यादेखील सापडल्या आहेत.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने करायला हवी होती. परंतु अशा प्रकारच्या कारवाया करताना ते दिसत नाहीत. ही कारवाई पोलिसांनी केल्यानंतर पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने करणे आवश्यक होते. परंतु एफडीएच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे (अन्न व औषध प्रशासन विभाग) आज वेळ नसल्याने ते मंगळवारी कारवाईसाठी येणार आहेत : मल्हार थोरात (पोलीस उपनिरीक्षक, पालघर विशेष पथक)